Thursday, February 25, 2016

२१. काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |

|| समर्थ वाणी ||

२१. काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |

           काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |
           मद मत्सर वोहटेना | भूलि पडिली || ३/१०/४||

          समर्थांनी संसाराला महापुराची उपमा दिली आहे. या महापुरात अनेक विकार भुलवत असतात. त्यात कामवासना फार वाईट म्हणून तिची मगरमिठी असा समर्थ उल्लेख करतात. कामवासनेची मगरमिठी सुटत नाही, कामवासना मनातून जात नाही. मद मत्सर हे विकार कमी होत नाही, माणूस एक प्रकारच्या मोहित अवस्थेत असतो.
          जेथे काम आहे तेथे क्रोध हा स्वाभाविक येतोच. व्यक्तीच्या मनामध्ये अनेक विषयांचा भोग घ्यावा ही लालसा नेहमीच जागरूक असते. मग ही लालसा देहभोगा विषयी असो अथवा इतर इंद्रियतृप्ती विषयीची असो. कोणत्याही विषयभोगाची लालसा माणसाचा सर्वनाशाच करते. कामवासना या विकारामध्ये शृंगाराचे पावित्र्य न येता यामध्ये स्त्री पुरुष एवढीच दृष्टी असते. यामध्ये पावित्र्य, एकात्म भाव-जीवन या व्यापक विचाराना थारा नसतो. मग या विकारातूनच लहान वयातील मुलींपासून उतार वयातील स्त्रीयांपर्यंत अनेक जाणीवर बलात्कार झाल्याचे वृत्त आपल्या कानावर येते. तरुण तरुणींवर याचा इतका प्रभाव असतो की उघड्यावर कोणतीही गोष्ट करण्यात त्यांना गैर वाटत नाही. हल्ली पशुप्रमाणे केवळ नरमाद्यांचे उघड्यावर मिलन हे मानव समाजातील प्रदूषणच म्हणावे लागेल. लोकांना न भय, न लज्जा त्यामुळे अनाथालायांची वाढ होत आहे , नको त्या रोगांना सामोरे जावे लागत आहे.
            रजोगुणापासून निर्माण होणारे हे विकार आपल्या मनावर साम्राज्य गाजवतात पण आपल्याविषयी त्यांच्या मनात दया उत्पन्न होत नाही . आपल्या आणि इतरांच्या नाशाला कारणीभूत ठरणाऱ्या या विकारापासून दूर राहण्यास समर्थ आपल्याला सांगतात.  यामध्ये यश येण्यासाठी मनावर संयम, प्रयत्नपूर्वक साधना, या माध्यमातून मन स्थिर होणे आवश्यक आहे. यासाठीच सत्पुरुषांचा सहवास, कल्याणकारी शास्त्रांचा अभ्यास आणि सद्गुरूंचा आशीर्वाद याचा लाभ व्हावा लागतो.....क्रमशः

|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment