Wednesday, February 24, 2016

२०. कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |

|| समर्थ वाणी ||

२०. कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |

कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |
अमृत सेविताच पावला | मृत्य राहो || १/१/२५ ||

कामक्रोधाने बरबटलेला माणूस चांगला असूच शकत नाही असे समर्थांचे मत आहे. काम,क्रोध,लोभ ही नरकाची तीन द्वारे जी आत्म्याचा नाश करतात म्हणूनच त्याचा त्याग करावा याविषयीचे मार्गदर्शन भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये केले आहे. आजच्या २१ व्या शतकात माणसाने आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली दिसते. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्तीत जास्त सुखी कसे राहता येईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असलेला आढळतो. ह्या बाह्यसजावटी बरोबर आपले मन देखील सुदृढ असावे याकडे मात्र त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. या भोगावादी जगात यांत्रिक विकासाला जेव्हढे प्राधान्य दिले जाते तेव्हढेच मानसिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. सततची जीवघेणी स्पर्धा माणसाच्या मनातील या विकारांना खतपाणी घालत असल्याने या विकारांचा विकास अधिकाधिक होताना दिसतो. या षडविकाराच्या प्रभावाने माणसातील माणूसपण हरवत चालले आहे.
            मनामध्ये निर्माण होणारी एक इच्छा कामक्रोधा बरोबर आशा, तृष्णा, दंभ, अहंकार या विकाराना घेऊन येते आणि आपला सर्वनाश करते. साधूसंत , देव ब्राम्हादिकाना देखील न सोडणारे हे विकार आहेत. यासाठीच समर्थ आपल्याला सतत सावध राहण्याची सूचना करतात. अर्जुन हा आपणा सर्वांचे प्रतिक आहे. त्याच्यासारखी संभ्रमित अवस्था आपली देखील झालेली आहे. यासाठीच या दोषांचा नाश करून आपण आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे याचे मार्गदर्शन भगवंतांनी केले आहे.......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment