Thursday, February 18, 2016

१४. धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |


|| समर्थ वाणी ||

१४. धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |

            अध्यात्मशास्त्र आम्हाला दुबळे बनवते , सतत नम्रता शिकवते असा तक्रारीचा सूर आपला असतो. हे शास्त्र नेमके काय सांगते हे नीट न समजल्यामुळे या शिकवणी विषयी अनेक प्रश्न मनात उभे राहतात. जसे सतत नम्र राहायचे तर मग जर कोणी दुर्जन किंवा दुष्ट समोर आला तर त्यांना प्रतिकार करावयाचा नाही का ? जो अन्याय ते करतात तो सहन करायचा का ? परंतु हे शास्त्र नीट समजून घेतले तर या भौतिक जगात नेमके कसे जगावे , कोणत्या प्रसंगी कसे वागावे याचे अचूक मार्गदर्शन केले गेले आहे.
           
               समर्थांनी अनेक ठिकाणी सतत सावधपणे कसे वागावे याचे मार्गदर्शन केलेच आहे तसेच दासबोधातील ‘राजकारण निरुपण’ या १९ व्या दशकातील नवव्या समासात समर्थ चतुरपणे, धूर्तपणाने कसे वागावे याचे मार्गदर्शन करतात.  या समासामध्ये समर्थ स्पष्टपणे सांगतात की दुष्ट आणि दुर्जनांच्या भयाने आपले कार्य विस्कळीत होऊ देऊ नये. त्याना योग्य पद्धतीने शह द्यावा. लोकसंग्रह करताना नाना प्रकारच्या व्यक्ती भेटत असतात. त्यातील दुर्जन व्यक्ती ओळखून ठेवाव्यात पण त्यांना सर्वामध्ये प्रगट करू नये अशी सूचना देखील देतात. कारण अशा व्यक्ती आपल्या कार्यात कटकटी करत राहतात म्हणून समर्थ आपल्याला सावध करतात. एखादी दुर्जन व्यक्ती त्याचामधील वाईट गुणांमुळे परिचित असेल तर अशा व्यक्तीना एकदम दूर न लोटता त्यांना जवळ करून त्यांच्या वृत्तीतील दुर्जनाचा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यास समर्थ सांगतात. त्यांचातील दोष सतत दाखवून दिले तर कटूता वाढते म्हणून मृदू बोलण्याने, क्षमाशील वृत्तीने त्या व्यक्तीचे मन बदलावे . त्याच्यातील वाईट वृत्तीचा नाश करावा. तरीही यश मिळाले नाही तर मात्र ,  

हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास  टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद || १९/९/२९||

धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी || १९/९/३०||

समाजातील गुंडगिरी साफ मोडून काढावी, अन्यायाचा प्रतिकार करावा ही समर्थांची शिकवण आहे. वाईट व्यक्तीच्या नाशापेक्षा वाईट वृत्तीच्या नाशाला त्यांनी  अधिक प्राधान्य दिले.....क्रमश:


|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment