|| समर्थ वाणी ||
१३. मुळी उदक निवळ असते | नाना वल्लीमध्ये जाते |
मुळी उदक निवळ असते | नाना वल्लीमध्ये जाते |
संगदोषे तैसे होते | आंब्ल तिक्षण कडवट || १७/७/१||
पाणी मुळातच स्वच्छ असते. अनेक प्रकारच्या वेली, वनस्पतीमध्ये ते शिरते. आणि त्याच्या संगतीचा दोष लागून ते आंबट,तिखट किंवा कडू बनते. संगतीचा परिणाम असा आहे. मुळात आत्मा हा शुद्धच असतो पण त्याला देहाची संगत लागली की त्याचे शुद्धपण लोपते आणि त्यांच्यात विकार उत्पान्न होतात. माणसामध्ये असणारी आसक्ती ही सर्व विकारांची आई आहे. त्यामुळे या आसक्तीलाच जर मारले तर तिची सर्व पिल्ले आपोआप मरून जातात असे समर्थांचे सांगणे आहे पण त्यासाठी उत्तम संगत असणे महत्वाचे आहे. ज्याच्या संगतीत अंतरंग पालटते अशा माणसांची नेहमी संगत धरावी.
या सृष्टीतील विवेकी लोकांची संगत प्रत्येकाने धरावी असा समर्थांचा आग्रह आहे. परंतु सत्संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असली तरी ती टिकणे फार महत्वाचे आहे. कारण सामान्य माणसाला विषयोपभोगात अधिक रस असतो. देहाचे चोचले पुरविण्याकडे त्याचा अधिक कल असतो. या विकारांचा संग देखील घातकच. दु:संग हा भक्तीमार्गातला मोठा अडसर आहे. नारद भक्तीसूत्रातील ४३ व्या सूत्रात ‘दु:संग सर्वथा त्याज्य:’ हे सांगून सत्संगाचे महत्व स्पष्ट केले आहे. दु:संगाने काय घडते याचे कारण भागवतात कपिल देवहुती यांच्या संवादात पहावयास मिळते. कपिलमुनी म्हणतात, “ दुष्ट संगाने सत्य, पावित्र्य, दया, मननशीलता, बुद्धी, लज्जा, श्री, कीर्ती, क्षमा, मन:शांती, इंद्रिये ताब्यात राहणे आणि ऐश्वर्य इत्यादी सर्व गुणांचा नाश होतो.” म्हणूनच बुद्धीमंतानी दुष्टाच्या संगतीचा त्याग करावा. आणि संताच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. यत्नवादाची शिकवण देणारे समर्थ प्रयत्नाची संगत ठेवण्याचे मार्गदर्शन करतात.....क्रमाश:
|| जय जय रघुवीर समर्थ ||
No comments:
Post a Comment