Tuesday, February 23, 2016

१९. दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |

|| समर्थ वाणी ||

१९. दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |

दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |
हे अज्ञानाचे लक्षण | भगवद्गीतेत बोलिले || १२/१०/२८||

            भगवदगीतेमध्ये भगवंतानी नरकाची जी तीन द्वारे सांगितली आहेत त्यापैकी क्रोध हा एक आहे. क्रोधाने स्वत:चा तसेच इतरांचा देखील नाश करणारी अनेक उदाहरणे आपण समाजात पहातो. स्वत:बरोबर इतरांचा नाश करणाऱ्या क्रोधावर विजय मिळवण्यास समर्थ सांगतात. क्रोध हा असा विकार आहे की तो येताना आपले इतर बांधव म्हणजेच मद, मत्सर, दंभ यांना देखील आपल्याबरोबर घेऊन येतो. माउलींनी या विकारांना ‘विषयदरीचे वाघ’ असे संबोधले आहे. या विकारांचे वैशिष्ट्य हे की ते येताना पाहुणे म्हणून येतात आणि नंतर मात्र आपणच त्यांच्या इतके आहारी जातो की त्यांचे गुलामच बनतो. यासाठी समर्थ आपल्याला वेळेत सावध होण्याचा इशारा देतात.

            ‘उत्तमपुरुष निरुपण’ या समासामध्ये समर्थांनी दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. तसेच अठराव्या दशकातील सहाव्या समासामध्ये तोंडाळ, कठोर वचनी, शीघ्रकोपी माणसाला समर्थांनी ‘राक्षस’ म्हणून संबोधले आहे. ‘दंभ’ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सर्व दुर्गुणांचा हा राजा आहे. म्हणूनच भगवदगीतेत असुरी संपत्तीचे वर्णन करताना दंभ या दुर्गुणाला मानाचे स्थान दिले आहे.(१६/४)
           
            दंभ याला इंग्रजी मध्ये हायपोक्रसी हा शब्द आहे. याचा अर्थ नाटकीपण, देखावा, बाह्य डामडौल, उर्मटपणा, कठोरपणा, अज्ञान ही सर्व असुरी प्रवृत्तीत जन्मलेल्याची लक्षणे आहेत. समर्थांना सर्वात जास्त चीड या अनैतिक दुर्गुणाची आहे. यासाठीच उत्तम महंत होण्यासाठी महंत व्हा पण महंती करू नका असे समर्थ आपल्या शिष्यांना बजावतात. खोटा डामडौल आला की दंभ हा आलाच म्हणून समर्थांना महंतीचा तिटकारा आहे. हा विकार नसेल तर मनातले विचार आणि आचार याचा मेळ जमेल . विकारांवर विजय मिळवता आला तर मन:शांती लाभणे शक्य आहे.......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ || 

No comments:

Post a Comment