Sunday, February 21, 2016

१७. धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |

|| समर्थ वाणी ||

१७. धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |

धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |
जो जो कीजे परमार्थ लाहो | तो तो पावे सिद्धीते|| १/१०/१||

            समर्थांनी नरदेह स्तवनातील समासामध्ये नरदेहाचा या शब्दात गौरव केला आहे. मानवाला प्राप्त झालेल्या या नरदेहाचा माध्यम म्हणून उपयोग करून घेऊन जीवाने आपल्या जन्माचे सार्थक करावे ,आनंदी आणि यशस्वी जीवन जगावे यासाठी समर्थ मार्गदर्शन करतात. समर्थ हे शक्तीचे उपासक आहेत. शक्तीला महत्व देताना केवळ शाररीक शक्तिलाच महत्व न देता मानसिक, वैचारिक, आर्थिक, अध्यात्मिक अशा सर्व ज्ञात तसेच अज्ञात शक्तीला महत्व देतात. आपल्याला प्राप्त झालेला नरदेह ही आमची खरी ताकद आहे. जगाच्या पाठीवर अनेक प्राणी आहेत. पण यामध्ये मनुष्य प्राणी हा असा आहे की त्याला प्राप्त झालेला देह हा अनेक शक्तींनी युक्त आहे. या प्राप्त झालेल्या सामर्थ्याचा त्याने योग्य उपयोग करून घेतला पाहिजे.  
   
         सर्व प्रथम आपल्याला प्राप्त झालेल्या या देहाची काळजी घेणे महत्वाचे आहे.यासाठीच समर्थांनी आपल्या आयुष्यात बलोपासनेला महत्व दिले. स्वत: समर्थ रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. त्यांनी आपल्या कृतीतून बलोपासनेची दीक्षा देऊन सर्वांना बलसंपन्न होण्याची प्रेरणा दिली. बलोपासने बरोबर मनाचे सामर्थ्य ओळखून मनाला योग्य संगतीत ठेवून त्याला योग्य वळण लावावे याची मार्गदर्शन केले. माणसाला मनन, चिंतन करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. उत्तम देहाच्या आणि उत्तम सकारात्मक विचाराच्या सहाय्याने मानवाने आपले जीवन विकसित करून घ्यावे. या दोन्हीला जर विवेकाची जोड दिली तर या देहाचे निश्चितच सार्थक होईल हा समर्थांना विश्वास आहे. या देहाला आणि मनाला जे वळण लावणार आहोत तसेच आपले आयुष्य घडणार आहे. या दोन्हीच्या माध्यमातून जो जो प्रयत्न करणार आहोत तो यशस्वीच होणार आहे. प्रत्येक जीवाचे अंतिम ध्येय परमार्थ प्राप्ती हेच असावे तरच खरा आनंद आणि समाधान प्राप्त होणार आहे हे याची जाणिव त्यांनी करून दिली आहे........क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment