Wednesday, January 20, 2016

१०. ऐक सदैवपणाचे लक्षण | रिकामा जाऊ नेदी येक क्षण |


                                   || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

१०. ऐक सदैवपणाचे लक्षण | रिकामा जाऊ नेदी येक क्षण |

      समर्थांनी वेळेचे महत्व पदोपदी समजावून दिले आहे. आपल्या आयुष्यातला कोणताच क्षण वाया जाऊ न देणे हेच खरे भाग्याचे लक्षण असल्याचे समर्थ ठामपणे सांगतात. समर्थ म्हणतात,

ऐक सदैवपणाचे लक्षण | रिकामा जाऊ नेदी येक क्षण |
प्रपंच व्यवसायाचे ज्ञान | बरे पाहे ||११.३.२४||

आपल्या आयुष्यात वेळेला अतिशय महत्व आहे. गेलेली वेळ परत कधीही येत नाही हे जाणूनच समर्थांनी ‘सिकवण निरुपण’ या समासामध्ये वेळेचे महत्व स्पष्ट केले आहे. सामान्य माणसाने आपले जीवन यशस्वी करण्यासाठी कसे वागावे याची रूपरेषा या समासामधून समर्थ आखून देतात. समर्थांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. आळस सोडून अचूक प्रयत्न कसे करावेत याविषयी या समासामध्ये समर्थ मार्गदर्शन करतात. प्रात:काली उठून काही पाठांतर करावे, प्रात:स्नान करून संध्या करावी, पितृतर्पण करावे, देवाची पूजा करावी आणि यथासांग वैश्वदेव करावा. व्यवहारात वागताना प्रामाणिकपणा आणि सावधपणा बाळगावा. सर्वाशी गोड बोलावे, स्नेह जोडावा, जेवण झाल्यावर थोडे वाचन, चर्चा करावी, एकांतात बसून निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करावा. एकही क्षण वाया न घालवण्यामागे वेळेचे व्यवस्थापन दिसून येते.
     
      कल करे सो आज कर, आज कारे सो अब | पल मे परलै होयगी बहुरि करेगो कब || अशा रीतीने जर मनुष्य जगला तर तो शहाणाच होतो. ज्याला आयुष्यात काही करावयाचे आहे त्याने आपला सर्व वेळ सत्कारणी लावावा असा आदर्श समर्थांनी या समासाद्वारे आपल्यापुढे ठेवला आहे.  कोणतेही काम करताना ‘नंतर करू’ असे आपण सहज म्हणून जातो. परंतु नंतर देखील हे काम आपल्यालाच करावे लागणार आहे याचा आपल्याला विसर पडतो. साधे उदाहरण म्हणजे घरातील पसारा किंवा कोणतीही वस्तू जागेवर न मिळणे. वेळच्या वेळी सर्व कामे केल्याने वेळेची बचत होते आणि वेळेचे व्यवस्थापन देखील अचूक होते याचा शेवटी ज्याचा त्यानेच अनुभव घ्यायचा आहे अस वाटत नाही का ?......क्रमशः
                       
                              || जय जय रघुवीर समर्थ ||


Tuesday, January 19, 2016

९. यत्न तो देव जाणावा | यत्नेवीण दरिद्रता |

                                      || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

९. यत्न तो देव जाणावा | यत्नेवीण दरिद्रता |
     
      समर्थांनी आपल्या कृतीतून तसेच विचारातून प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. ‘यत्न तो देव जाणावा | यत्नेवीण दरिद्रता |’ ही समर्थांची उक्ती सर्वांना अत्यंत उपयुक्त आहे. या बोधवाक्यामधून समर्थ आपल्याला प्रयत्नांना देव मानण्याची शिकवण देतात. कोणत्याही गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘अचूक’ प्रयत्नांबरोबर कष्टाची तयारी असेल तर यशश्री नक्कीच प्राप्त होणार आहे. केवळ दैवावर हवाला ठेवून कोणतीच गोष्ट सध्या होत नाही हे जाणूनच समर्थांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. यासाठी आळस सोडून अविरत परिश्रम करून ध्येय गाठता आले पाहिजे. अचूक प्रयत्न न करता अपयशाच्या पायरीवर जर कोणी रडत बसला तर तो कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.
                  मनी धरावे ते होते | विघ्न अवघे नासोनी जाते || ६.७.३०||
      मनाचे सामर्थ्य एवढे आहे की  मनाने जर कोणता संकल्प केला तर तो कोणतीही विघ्ने न येता पार पडतो. इतरत्र धावणारे मन विवेक वृत्तीने आवरावे. अचूक प्रयत्नाने कोणतीही गोष्ट सहज साध्य होते हा समर्थांचा धृढ विश्वास आहे.

कष्टेविण फळ नाही | कष्टेविण राज्य नाही |
कष्टेविण होत नाही | साध्य जनी ||१८.७.३||
     
      समर्थांच्या या उक्ती मधून मनाच्या संकल्प शक्तीचा प्रत्यय येतो. अचूक प्रयत्न आणि जिद्द तसेच कष्ट केल्याने सुखाची प्राप्ती होते. मनुष्याने जर अचूक प्रयत्न केले तर त्याच्या ऐहिक, पारलौकिक, पारमार्थिक सुखाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पण प्रयत्नाची कास न धरता जर केवळ दैवावर हवाला ठेवून आळशीपणा केला तर मात्र अपयश पदरात पडते. आळस हा माणसाचा महाशत्रू आहे. तो त्याच्या प्रगतीच्या विकासाच्या आड येतो .म्हणून समर्थ आपल्याला आळसा पासून दूर राहण्याची शिकवण देतात. या आळसाने काय होते तर ,

आळसे गेली धारणा वृत्ती | आळसे मळिन जाली वृत्ती |
आळसे विवेकाची गती | मंद जाली ||८.६.२३||
आळस हा प्रयत्न बुडवणारे आहे. आचार विचारापासून दूर नेणारा आहे. असा हा करंट्याना आवडणारा आळस सोडून सतत कार्यरत राहा हा संदेश समर्थ आपल्याला देतात......क्रमशः

                        || जय जय रघुवीर समर्थ ||

Wednesday, January 13, 2016

८. अवगुण सोडिता जाती | उत्तम गुण अभ्यासिता येती |

                                     || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

८. अवगुण सोडिता जाती | उत्तम गुण अभ्यासिता येती |
   
            अवगुण सोडिता जाती | उत्तम गुण अभ्यासिता येती |
            कुविद्या सांडून सिकती | शहाणे विद्या || १४/६/५ ||

हे दासबोधाचे प्रधान सूत्र आहे. अचूक प्रयत्नांच्या आधारे कोणीही आपल्यामध्ये हवा तसा बदल घडवू शकतो हा समर्थांचा विश्वास आहे. सुधारणा नेहमी दुसऱ्याने करावी अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. परंतु बदल करावयाचा असेल तर त्याची सुरवात स्वत:पासून करावी. तसेच स्वत:मध्ये बदल घडवून दुसऱ्यामध्ये तसाच चांगला बदल घडवून आणावा याविषयी समर्थ मार्गदर्शन करतात.

      चातुर्य लक्षण या समासामधून समर्थांनी आत्मपरीक्षण करून प्रयत्नपूर्वक स्वत:मधील दोषांचा त्याग करण्यास सांगितले आहे. प्रत्येकाने स्वप्रयत्नाने आपल्यामधील गुणांचा विकास करून आपले व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवावे असे समर्थांचे सांगणे आहे. हा विषय अधिक सहजतेने कळावा यासाठी समर्थ समासाच्या प्रारंभीच सांगतात की मनुष्याला प्राप्त झालेले रूप आणि सौंदर्य हे गुण अभ्यासाने प्राप्त होत नाहीत तर या गोष्टी माणसाला वंश परंपरेने लाभलेले असते. त्यामध्ये बदल करायचा म्हंटले तर बदल करता येत नाही पण अवगुण सोडायचे म्हंटले तर सोडता येतात आणि उत्तम गुण अभ्यासपूर्वक मिळवता येतात. अवगुणाचा त्याग करून माणसाने सद्गुणी बनावे आणि आपले अंतरंग चातुर्याने संपन्न करावे, समाजात मोठेपण मिळवावे असे समर्थांचे सांगणे आहे. त्यासाठी दृढनिश्चय, सातत्य याची आवश्यकता असते. परंतु प्रत्यक्षात घडते वेगळेच माणसाला आपले अवगुण हे अवगुण न वाटता गुणच वाटू लागतात. समर्थ म्हणतात,

            सकाळ अवगुणामध्ये अवगुण | आपले अवगुण वाटती गुण |
            मोठे पाप करंटपण | चुकेना की || १९/८/८||

आपले अवगुण गुण वाटणे हा माणसाच्या अंगी असणाऱ्या अवगुणामधील मोठा अवगुण आहे असे समर्थ म्हणतात. हे मोठे पाप आहे त्यामुळे माणसाचा करंटेपणा चुकत नाही. अशा करंट्याचा आणखी एक दोष म्हणजे,

            आपले झाकी अवगुण | पुढिलासं बोले कठीण | 
            मिथ्या गुणदोषेविण | गुणदोष लावी || ५/३/९२||

तो आपले अवगुण झाकून ठेवतो पण दुसऱ्यांना त्यांच्या दोषांबद्दल कठीण शब्द बोलतो, ज्याच्या अंगी जे गुणदोष नसतात ते तो खोटेपणाने त्यांच्यावर लादतो. समर्थ म्हणतात अशा व्यक्तींना भगवंत भेटत नाही किंबहूना अशा मदोन्मत्त माणसांची बुद्धी भगवंताकडे कधीच वळत नाही. म्हणून वेळीच सावध हो आणि अवगुणांचा त्याग कर,
          अवगुण अवघेची सांडावे | उत्तमगुण अभ्यासावे | 
          प्रबंद पाठ करीत जावे | जाड अर्थ || १८/३/१३||

....क्रमशः


                          जय जय रघुवीर समर्थ 

७. निंदा द्वेष करू नये | असत्संग धरू नये |

                                   || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

७. निंदा द्वेष करू नये | असत्संग धरू नये |

                      निंदा द्वेष करू नये | असत्संग धरू नये |
                      द्रव्यदारा हरू नये | बळात्कारे || २/२/७||

      माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या अंत:करणाची परीक्षा होते. त्याच्या शब्दातून त्याच्या मनातील वाईट किंवा चांगले विचार व्यक्त होत असतात. आपल्या मुखातून चांगले विचार व्यक्त होण्यासाठी परनिंदा करू नये असे सांगून निंद्य गोष्टींचा त्याग करण्यास समर्थ सांगतात. निंदेसारखे पातक नाही. आपण आपल्या मनात दुसऱ्या विषयी गैरसमज, राग, द्वेष यांना थारा देतो. दुसऱ्याविषयीच्या निंदेमुळे, रागामुळे आपलेच मन दुषित होत असते हे आपल्या लक्षात येत नाही. हा दोष स्वत:ला घातक आहेच पण यामुळे समाजाचे देखील नुकसान आहे. समाजातील संघटक वृत्तीला घातक असलेल्या या दोषाचा त्याग करा असे समर्थ वारंवार सांगतात.
      
       भगवद्गीतेत सतराव्या अध्यायात वाचिक तपाचे महत्व आले आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात,
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत ||
स्वध्यायाभ्यसनं चैव वाड्मयं तप उच्यते ||भ.गी. १७/१५||
      
         क्षोभ उत्पन्न न करणारे, खरे प्रिय व हितकर अशी वाणी आणि वेदांचे नित्य अध्ययन यास वाड्मय तप म्हणतात. या तपात अहंकाराचा त्याग आवश्यक आहे, बोलण्यावर नियंत्रण आवश्यक आहे.
      
          भगवद्गीतेत परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्रात आहे हे सूत्र भगवंत आपल्याला सांगतात. त्या सूत्राला अनुसरून, सतत एखाद्याची निंदा केल्याने त्या व्यक्ती पासून मनुष्य आपोआपच दूर जातो. अर्थात त्याच्यामध्ये अंतरभूत असलेल्या ईश्वरी तत्वापासून तो दूर जातो. परमेश्वराशी जवळीक साधण्यासाठी प्रथम परस्परांशी प्रेमभावाने वागले तर आपोआपच परमेश्वर प्राप्तीचा आनंद लाभणार आहे.
      
        समर्थांनी देखील आपल्या प्रबोधनात आपल्याला प्राप्त झालेले वाणीचे सामर्थ्य जपून वापरण्यास सांगितले आहे. आपल्या वाणीला खोटे बोलण्यापासून, उद्धटपणापासून, निंदा करण्यापासून परावृत्त करावयाचे आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या या शक्तीचा योग्य वापर करावयाचा आहे.....क्रमशः



जय जय रघुवीर समर्थ 

Saturday, January 9, 2016

६. सत्यमार्ग सांडू नये | असत्य पंथ जाऊ नये |

                                  || श्रीराम ||


|| समर्थ वाणी ||

६. सत्यमार्ग सांडू नये | असत्य पंथ जाऊ नये |

                  सत्यमार्ग सांडू नये | असत्या पंथे जाऊ नये |
                  कदा अभिमान घेऊ नये | असत्याचा || दा. २/२/४०||  

      समर्थ ‘उत्तम लक्षणे’ स्पष्ट करताना सत्याची कास धरण्याचा मोलाचा उपदेश केला आहे. वाणीचे पावित्र्य जपताना समर्थ असत्य वाणीचा त्याग करण्यास सांगतात. आपल्या जीवनात सर्व सुंदर गोष्टींचे संतुलन असावे यासाठीच समर्थ आपल्याला सत्यमार्ग सोडू नका असे सांगतात. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात,
                 मना सर्वथा सत्य सोडू नको रे | मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे |
                 मना सत्य ते वाचे वदावे | मना मिथ्य ते मिथ्य सोडोनि द्यावे || १९ ||
      नेहमी सत्य बोलावे यावर समर्थांचा भर आहे. सत्य बोलताना हेतू शुद्ध असला पाहिजे. त्यामध्ये स्वत:चा स्वार्थ लपलेला नसावा. तसेच त्याचा परिणाम देखील चांगलाच असावा. या सत्यवचनात दुसऱ्याचा घात करणारे सत्य अपेक्षित नाही. तर धर्माला अनुसरून दुसऱ्याला हितकारक असे सत्यप्रिय वचन समर्थांना अधिक प्रिय आहे. गायीचा मृत्य टाळण्यासाठी बोललेले असत्य वचन हे असत्य असले तरी त्या परिस्थितीत ते अनुकूलच होते. सत्य वचन अंगी बाणावे पण त्याचा वापर देखील सावधपणे करावा. सत्य बोलताना सारासार विचार महत्वाचा आहे. तसेच दुसऱ्याला खूष करण्यासाठी, स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी असत्य बोलून वाणीचे पावित्र्य नष्ट करू नये.
      आपल्या पुतण्यांना उपदेश करताना देखील समर्थ सांगतात की,
                बरे सत्य बोला यथातथ्य चला | बहु मानिती लोक तेणे तुम्हाला |
                धरा बुद्धि पोटी विवेके मुले हो | बारा गुण तो अंतरामाजी राहो ||

सत्यवचन, प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टीना जर आपल्या जीवनात महत्व असेल तर आपल्याला कशाचे भय वाटत नाही. असत्य हे लंगडे असते. एखादी खोटी गोष्ट खरी आहे हे सांगण्यासाठी अनेक खोट्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. या खोटेपणामुळे मनावर नकळत एक ताण आलेला असतो. नेमके खोटे काय बोललो होतो हे आठवावे लागते आणि त्याचेच दडपण मनावर सतत असते. याशिवाय आपला खोटेपणा झाकण्यासाठी माणूस आपले खोटे विचार जोरजोरात आक्रस्ताळेपणाने मांडतो. त्याच्या या वागण्याने तात्पुरता जरी लोकांवर प्रभाव पडला तरी त्याचा खोटेपणा कालांतराने उघडा पडतो. उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी या अवगुणापासून दूर राहण्यास समर्थ सांगत आहेत......क्रमशः 

                            || जय जय रघुवीर समर्थ ||

Friday, January 8, 2016

५. कठीण शब्दे वाईट वाटते |

                                    || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

५. कठीण शब्दे वाईट वाटते |

     समर्थांच्या वाड्मयामधून आदर्श मानवी जीवन कसे जगावे याचे मौलिक मार्गदर्शन घडते. वाचिक तपाचे महत्व जाणणारे समर्थ आपली वाणी कशी असावी याचे अचूक मार्गदर्शन त्यांच्या वाड्मयामधून करतात.
                  कठीण शब्दे वाईट वाटते | हे तो प्रत्ययास येते | 
                  तरी मग वाईट बोलावे ते | काय निमित्ये || दा. १२/१०/२३ ||
      ‘ उत्तमपुरुषाची लक्षणे ‘ या समासात याविषयी निरुपण करताना समर्थांनी स्वत:वरून दुसऱ्याचे अंत:करण कसे जाणावे याचे सोपे सूत्र सांगितले आहे. उत्तम गुणांपैकी वाणीची मधुरता हा गुण समर्थ प्रधान मानतात. माणसाने नेहमी स्वत:वरून दुसऱ्याची परीक्षा करावी. दुसऱ्याच्या कटू बोलण्याने जसे आपले मन दुखावते तसेच आपल्या कठोर शब्दाने दुसऱ्याचे मन दुखावू शकते हा विचार करण्यास समर्थ आपल्याला भाग पाडतात. या कृतीमधून बोलणाऱ्याला त्याक्षणाला जरी आनंद प्राप्त झाला तरी ज्याला बोलले जाते त्याचे मन दुखावले जाते. त्यातून दुसऱ्याचे मनात शत्रुत्वाची भावना जोपासली जाते आणि मग परस्परांविषयी राग द्वेष वाढत जातो. यासाठी मनाच्या श्लोकात देखील समर्थ म्हणतात की, 
                 स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे | मना सर्व लोकासी रे नीववावे || ७ || 
      त्यांच्या या विचारातून त्यांचा सामाजिक मानसशात्राचा सूक्ष्म अभ्यास दृष्टीस पडतो.
लोकसंग्रहाच्या दृष्टीने समर्थांनी वाणीचे महत्व वारंवार स्पष्ट केले आहे. आजच्या युगात देखील कामाच्या ठिकाणी “ टीमवर्क” असते तेव्हा परस्परांच्या सहकार्याने कोणतेही काम पूर्णत्वाला जात असते. अशावेळी एकमेकांना साक्जून घेऊन कोणाचे मन न दुखावता काम करणे गरजेचे असते. आपली वाणी जर गोड असेल, दुसऱ्याला जाणून घेण्याची क्षमता असेल तर अशा व्यक्ती जीवनात यशाच्या शिखराच्या दिशेने वाटचाल करताना आपणा पाहतो.
दुसऱ्याला दुखावणारी वाणी ही अपवित्र असल्याचे समर्थाचे स्पष्ट मत आहे. समर्थ दासबोधामध्ये तोंडाळ, कठोरवचनी, शीघ्रकोपी माणसाला राक्षस संबोधले आहे. 
                 ऐसे लौद बेईमानी | कदापि सत्य नाही वचनी | 
                 पापी अपस्मार जनी | राक्षेस जाणावे || ( द.१८/६/५)
       शब्द हे अस्त्र आहे ते जपूनच वापरले पाहिजे. शब्दाचा वापर विवेकाने तसेच विचाराने केला पाहिजे. दुसऱ्याला दु:खी करणारे कटू शब्द नेहमीच कटूता वाढवितात. अशा शब्दांना थारा न देता बोलण्या वागण्यात नम्रता आणावी. संघटनेला महत्व देणारे समर्थ या सध्या सोप्या सूत्रांच्या आधारे संघटनेचे सोपे पण अवघड सूत्र शिकवून जातात.   
       प्रभू रामचंद्र हे समर्थाचे उपास्य दैवत होते. दशरथनंदन श्रीराम, आयोध्येचा भावी राजा प्रजाजनामध्ये मिसळत असे. सर्वाची दु:खे जाणून घेत असे. त्याच्या लाघवी बोलण्याने,  नम्र वाणीमुळे प्रजाजनांना दिलासा मिळत असे. समर्थ हाच आदर्श समोर ठेऊन आचरण करीत असत.......क्रमशः



जय जय रघुवीर समर्थ  

४. वाणीचे माधुर्य

                                                                         || श्रीराम ||

|| समर्थ वाणी ||

४. वाणीचे माधुर्य


      समर्थांनी मानवाला प्राप्त झालेल्या वाणीच्या सामर्थ्याबद्दल अनेक ठिकाणी वर्णन केलेले. शारदामातेचे स्तवन करताना समर्थांनी म्हंटले आहे,
जे उठती शब्दांकुर | वाडे वैखरी अपार | जे शब्दाचे अभ्यंतर | उकलून दावी || दा.द१.सं.३||
     शारदामातेचे हे सामर्थ्य समर्थांना ज्ञात आहे. शारदामातेच्या कृपे मूळ प्राप्त वाणीचे सामर्थ्य ओळखूनच समर्थांनी शारदामातेचे स्तवन केले आहे. वैखारी शब्दाद्वारे ही शक्ती व्यक्त होत असते. शारदामातेच्या कृपेचे मूळ शब्द हे सामर्थ्य माणसाला प्राप्त आहे, हे सर्व कर्तुत्व समूहच आहे, समर्थ म्हणतात.
                  ती वाचा अंतरी आले | ते वैखरिया प्रकट केले |
                  म्हणोनि कर्तुत्व जितुके जाले | ते शारदागुणे ||द.१/३/१४||
आपण मांडलेल्या ग्रंथाच्या प्राचार्यासाठी उत्तम शब्द सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून समर्थांनी आशीर्वाद मागून नमूद केले आहे. समर्थांनी ग्रंथरूपाने आपल्याला अमुल्य मिळवून दिले आहे त्याचे श्रेय ते स्वत: घेतात, तर हे सर्व बुद्धिचे, शब्दाचे सामर्थ्य, ईश्वरकृपेने प्राप्त विशाल समूह हे ग्रंथ कर्तुत्व आपल्या हातून घडत आहे हा कृतज्ञतेचा यामागे आहे.  
      शारदेचे हे महत्त्व तसेच शब्दाचे सामर्थ्य लक्षात ठेवा मनुष्य प्राण्याने त्याचा उपयोग करून पाहिजे. आपली वाणी जर गोड असेल तर मनुष्य जगमित्र होतो. आपल्या बोलण्यातून आपण अनेक मित्र जोडत असतो तसेच आपणही अनेक शत्रू निर्माण करत असतो. जगमित्र व्हंगे तर समर्थ म्हणतात
                   जग जगमित्र | जीवेपासी आहे सूत्र || दा.द.१९.सं.२.ओ.१९||
आपले बोलणे नम्रतेचे, आपल्या बोलण्याने इतरांची प्रसन्नता ठेवावीत, कोणाला दुखवू नये, आपल्या मृदू आणि लाघवी बोलण्याने आपण अनेकांनी मने स्वतःहून.....क्रमशः    




जय जय रघुवीर समर्थ 

Wednesday, January 6, 2016

३. शारदास्तवन :


                                   || श्रीराम ||

|| समर्थवाणी ||

३. शारदास्तवन :

      शारदामातेचे स्तवन सर्व संतांनी आपल्या वाड्मयामध्ये केले आहे. श्रीशारदादेवी ही ज्ञानाची तसेच वाणीची देवता आहे. श्रीगणेश कृपेमुळे आपल्याला जो अर्थ समजतो, त्याला शब्दरूप देण्याचे सामर्थ्य आपल्याला देवी शारदा देते. आपल्या मनातील विचार शब्दांच्या माध्यमातून प्रगट होतो आणि कृतीमध्ये उतरतो. शारदामातेचे हे सामर्थ्य ओळखूनच संतांनी श्रीगणेशा बरोबरच शारदामातेचे स्तवन केले आहे.
      
      श्रीमद दासबोधामध्ये शारदामातेचे स्वरूप स्पष्ट करताना समर्थ रामदासस्वामी यांनी म्हंटले आहे की, ही वेदांची आई आहे, ब्रह्मदेवाची कन्या आहे, नादाचे जन्मस्थान आहे, आणि वाणीची ती स्वामिनी आहे. परमेश्वराने निर्माण केलेली ही मोठी माया आहे. या मायेच्या प्रभावामुळेच जे अव्यक्त आहे ते शब्दाद्वारे व्यक्त होते, त्याला आकार प्राप्त होतो. समर्थ म्हणतात वाणीच्या चार प्रकारांचे मूळ असलेली देवी शारदा ही ईश्वराची शक्ती आहे, जी सर्वांमध्ये असूनही सर्वापासून अलिप्त आहे. अशा या अवर्णनीय शारदामातेचे स्तवन संत महात्मे अत्यंत नम्रपणे आपल्या वाड्मयात करतात. कारण त्यांना याचे ज्ञान आहे की, आपल्याला जे वाणीचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, आपल्या हातून जे ग्रंथ निर्मितीचे कार्य घडत आहे, ती केवळ या शारदामातेचीच कृपा आहे. हा भाव मनामध्ये ठेवूनच संत श्रीगणेश आणि आदिमाया शारदा या देवतेचे स्तवन करतात......क्रमशः

madhavimahajan17@gmail.com

|| जय जय रघुवीर समर्थ ||


Monday, January 4, 2016

२ बुद्धी देणे भगवंताचे

                                     || श्रीराम ||

|| समर्थवाणी ||

२ बुद्धी देणे भगवंताचे
माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून गणला जातो. त्याला बुद्धिची सर्वात मोठी देणगी परमेश्वराने बहाल केली आहे. समर्थ म्हणतात,
बुद्धि देणे भगवंताचे |बुद्धिविना माणुस काचे |
राज्य सांडून फुकाचे | भीक मागे || दा. १५/१/१५ ||
माणसाला बुद्धीचे सामर्थ्य भगवंताकडून प्राप्त झाले नसे तर मनुष्य आणि पशू यांच्यात काही भेद राहिला नसता. परंतु आपल्याला प्राप्त जाह्लेल्या या सामर्थ्याचा मनुष्यप्राणी अनेकदा दुरुपयोगच करतो. उत्तम बुद्धीचे सामर्थ्य प्राप्त होऊन देखील त्याचा योग्य वापर न करणाऱ्या लोकांबद्दल समर्थ वरील ओवीत म्हणतात को जो बुद्धिचा योग्य उपयोग करत नाही तो जणू काय राज्य टाकून भीक मागत फिरणारा करंटा आहे. स्वत:कडे असणाऱ्या बुद्धिचे ऐश्वर्य सोडून भीक मागणाऱ्या करंट्यानां समर्थ याठिकाणी उपदेश करत आहेत. आपण ज्या बुद्धी बद्दल बोलत आहोत ती बुद्धि म्हणजे काय ? बुद्धिने निर्णय घ्यायचा म्हणजे नेमके काय करायचे? या शंकेचे निरसन समर्थ सतराव्या दशकात करतात.
संकल्प विकल्प तेचि मन | जेणे करितां अनुमान | पुढे निश्चयो तोचि जाण | रूप बुद्धिचे || १७/८/६/
करीनचि अथवा न करी | ऐसा निश्चयेची करी | तोची बुद्धि हे अंतरी | विवेके जाणावी || १७/८/७/
संकल्प विकल्प करणारी जी जाणीव तेच मन समजावे. मनामध्ये जेव्हा अनुमान करणे चालते आणि त्यातूनच नंतर निश्चय घडतो तेव्हा जाणीवेला बुद्धिचे रूप आले असे समजावे. ‘ मी हे करीन ‘ किंवा ‘ मी हे करणार नाही ‘ असा मी निश्चय करते तीच बुद्धि होय. विवेकाने आपल्या अंतर्यामी हे जाणावे. या बुद्धीच्या योगाने साधकाने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. भगवद गीतेत भगवंत म्हणतात, ज्याची बुद्धि परब्रह्माच्या ठिकाणी रमते किंवा तेच आपण आहोत अशी भावना ज्याची बुद्धि करते, त्याचाच निजध्यास ज्याची बुद्धि करते, त्याची या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होते ( अ.५.श्लो.१७ ) माऊली म्हणतात,
बुधिनिश्चये आत्मज्ञान | ब्रह्मरूप भावी आपणा आपण | ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण | तत्परायण अहर्निशी||
आत्मज्ञानासंबधी त्याच्या बुद्धिचा निश्चय झाला म्हणजे, साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्णब्र्हमाकार ठेवून रात्रंदिवस त्याच्याच अनुसंधानात असतो. अशा या ज्ञानी पुरुषाची दृष्टी सर्वांच्या ठिकाणी सारखीच असते.......क्रमशः
जय जय रघुवीर समर्थ

Sunday, January 3, 2016

१ समर्थांचे गणेश स्तवन :

                                                                            ||श्रीराम ||

|| समर्थवाणी ||

१ समर्थांचे गणेश स्तवन :
        संत वाड्मयामध्ये स्तवनाला अत्यंत महत्व आहे. समर्थांनी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये पहिला संपुर्ण दशक स्तवनाला वाहिलेला आहे. या स्तवनामधून समर्थांचा नम्रभाव प्रकट होतो. यामधून श्रीगणेश, शारदामाता, सद्गुरू, संतसज्जन यासर्वांची कृपा आपल्यावर झाली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अफाट प्रतिभा तसेच सूक्ष्म बुद्धिमत्ता लाभलेले समर्थ या ग्रंथाचे सारे श्रेय यासर्वाना देतात.
        महाराष्ट्रामध्ये अनेक दैवते आहेत त्यापैकी श्रीगणेशाच्या उपासनेला विशेष महत्व दिले जाते. श्रीगणपती अथर्वशीर्ष, श्रीगणेश कवच, श्रीगणेश सूक्त, अशा विविध माध्यमातून त्याची उपासना केली जाते. गणपती हा गजानन, विनायक, एकदंत, लंबोदर अशा अनेक नावांनी ओळखला जातो. विघ्नांचा नाश करणारा हा विघ्नहर्ता विद्येची देवता म्हणून सर्वश्रेष्ठ मानला जातो. गणपतीच्या उपासनेने अज्ञान नाहिसे होऊन बुद्धी प्राप्त होते. सर्वत्र त्याची निष्ठेने पूजा केली जाते. सर्व सिद्धीचे फळ देणारा, अज्ञानाचे पटल दूर करून भ्रम नाहीसे करणाऱ्या गणेशाचे स्तवन समर्थ पहिल्या दशकात करतात,
ओम नमो जी गणनायेका | सर्वसिद्धी फळदायेका | अज्ञानभ्रांती छेदका | बोधरूपा |
माझिये अंतरी भरावे | सर्वकाळ वास्तव्य करावे | मज वाग्सुन्यास वदवावे | कृपाकटाक्षे करुनी || दासबोध      
        समर्थ गणेशाला वंदन करून त्याची कृपा संपादन करून घेतात. मनामध्ये एखाद्या गोष्टीचे अनुमान करून त्याचा अर्थ लक्षात घेऊन निर्णय घेतला जातो. यामध्ये ह्या अर्थाचे आकलन होण्यास मनुष्याला ज्ञानस्वरूप गणेशाची कृपा असणे आवश्यक असते. कारण त्याच्याच सत्तेने बुद्धीमध्ये स्फूर्ति निर्माण होते. या गणेशाची कृपा प्राप्त झाल्याने काय होते? समर्थ म्हणतात,
                                      तैसी मंगळमूर्ती आद्या | पासूनि जाल्या सकळ विद्या |
                                      तेणे कवी लाघव गद्या | सत्पात्रे जाले || दा.१७/१/३ ||
मंगलमूर्ती सर्व विद्यांचे मूळ आरंभस्थान आहे. त्याच्यापासून सर्व विद्या उत्पन्न होतात. त्याच्या कृपेने काही साधक उत्तम भव्य गद्य पद्यरचना करू शकतात आणि मोठ्या योग्यतेस चढतात. असा हा सर्व कर्तृत्वाचा उगम असणारा मूळ पुरुष श्रीगणेश, अज्ञान नाहीसे करून शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून देणारा श्रीगणेश,                      साधनेमध्ये अनेक विघ्ने निर्माण झाली तर त्याचा नाश करणारा असा हा विघ्नहर्ता श्रीगणेश. चौदाविद्यांचा स्वामी असणाऱ्या अशा या श्रीगणेशाला समर्थांनी वारंवार वंदन केले आहे. श्रीगणेशाच्या कृपादृष्टीने या सामर्थ्याचा योग्य तो उपयोग केला जावा या बुद्धीला विवेकाचे अधिष्ठान लाभावे अशीच प्रार्थना समर्थ या नमनाद्वारे करताना दिसतात....  क्रमशः

madhavimahajan17@gmail.com

जय  जय रघुवीर समर्थ