Tuesday, February 16, 2016

१२. सवे लावता सवे पडे | सवे पडता वस्तू आतुडे |

|| समर्थ वाणी ||

१२. सवे लावता सवे पडे | सवे पडता वस्तू आतुडे |

      मनाची चंचलता हा जरी दोष मानला तरीही मनाला आणि देहाला जशी सवय लावावी तसेच वर्तन आपल्याकडून घडते. समर्थ म्हणतात,

सवे लावता सवे पडे | सवे पडता वस्तू आतुडे |
नित्यानित्य विचारे घडे | समाधान || ७/७/१५ ||

मनाकडून ज्याचे सतत चिंतन मनन घडते तसेच ते बनते हा मनाचा मोठ्ठा गुण आहे . मनुष्य प्राण्यामध्ये एक महत्वाचा दोष आहे की त्याला वाईट सवयी लगेच लागतात. खरतर आपल्या मुळातल्या चांगल्या सवयींना या वाईट सवयी बाहेरून येऊन चिकटतात. पण कालांतराने त्याच आम्हाला अगदी चांगल्या आणि जवळच्या वाटतात. यासाठीच अध्यात्मशास्त्रात सत्संगाचे महत्व विषद केले गेले आहे. व्यवहारामध्ये काय किंवा परमार्थात काय व्यक्तीविकासाच्या जडण घडणीत संगतीला अत्यंत महत्व आहे. आपण कोणाच्या संगतीत आहोत यावरून आपल्या आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळते. व्यवहारामध्ये आपण चांगल्या व्यक्तीच्या सहवासात असू तर आपल्या व्यक्तिमत्वाचा उत्तम विकास होतो त्याचबरोबर आपल्यातील चांगुलपणाची धार अधिक तीव्र होते. पण जर आपली सांगत योग्य नसेल तर त्या व्यक्तीच्या वाईट सवयीनी आपले मन विचलीत होते.

      कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे उदाहरण घेतले तर त्याला लागलेले व्यसन हे जन्मजात त्याला लागलेले नसते. कोणाच्या तरी सवयी बघून, काहीतरी वेगळे करण्याच्या बहाण्याने या व्यक्ती या व्यसनांकडे वळतात. पण याचा दुष्परिणाम असा होतो की मन आणि शरीर या व्यसनाच्या इतके आहारी जाते की नंतर परत मागे वळूनही पहात नाही. या व्यसनांची लागलेल्या सवयीमध्ये काही गैर आहे असे त्याला वाटत देखील नाही. आपल्या मनाची अशी अधोगती होऊ नये यासाठी सत्संगाचे महत्व सांगितले गेले आहे. उत्तम संगत, उत्तम सवयी, यासाठी लागणारे सातत्य, चिकाटी यावर समर्थ सतत भर देतात. या उत्तमाचा ध्यास घ्यावा असे समर्थ वारंवार सांगतात. यासाठी उत्तम सांगत महत्वाची आहे. समर्थ म्हणतात,

उत्तम संगतीचे फळ सुख | अधम संगतीचे फळ दु:ख |
आनंद सांडूनिया शोक | कैसा घ्यावा || १७/७/१७||

उत्तम संगतीने सुख मिळते हे ठाऊक असताना देखील आनंदाचा अव्हेर करून दु:ख पत्करणाऱ्या अविवेकी माणसांना समर्थ सत्संगाचे महत्व समजावून सांगतात........क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment