Monday, February 22, 2016

१८. अवगुण अवघेची सांडावे | उत्तम गुण अभ्यासावे |

|| समर्थ वाणी ||

१८. अवगुण अवघेची सांडावे | उत्तम गुण अभ्यासावे |

अवगुण अवघेची सांडावे | उत्तम गुण अभ्यासावे |
प्रबंद पाठ करीत जावे | जाड अर्थ || १८/३/१३||

अवगुण सोडावे म्हंटले तर सुटत नाहीत. त्याचाच लळा माणसाला अधिक लागतो. परंतु दृढनिश्चय, सातत्य आणि चिकाटी यामुळे अवगुण सोडता येऊ शकतात आणि उत्तम गुणांचा अभ्यास केला तर उत्तम गुण आपल्या अंतरंगात उतरतात हा विश्वास समर्थ आपल्याला देतात. जो माणूस विवेकाने आपले अंतरंग सजवतो तो सर्वांना सुखी करतो. अज्ञानी माणसाला मात्र स्वत:चे हित कळत नाही. तो स्नेह राखत नाही, उगाच सर्वांशी वैर करतो. उत्तम गुण अभ्यासताना सर्व प्रथम सर्वांशी स्नेह वाढवावा, आपले बोलणे सुधारावे, जगमित्र व्हावे.
हा प्रयत्न करत असताना सर्व प्रथम माणसाने षड्रिपूवर विजय मिळवणे आवश्यक आहे. या रिपुंमधील क्रोध हा सर्व नाशाला कारणीभूत ठरणारा विकार आहे. ज्यापासून कोसो लांब राहण्याची सूचना समर्थ आपल्याला करतात. हा विकार आपल्याला त्रासदायक ठरतोच पण दुसऱ्या व्यक्तीच्या दु:खाला देखील कारणीभूत ठरतो. हा क्रोध कसा बळावतो तर,

अभिमाने उठे मत्सर | मत्सरे ये तिरस्कार | पुढे क्रोधाचा विकार | प्रबळ बळे || १/१/२३ ||

विचार शक्ती नष्ट करणार, स्वत:बरोबर इतरांचा नाश करणाऱ्या क्रोधावर विजय मिळवण्यासाठीच समर्थ उत्तम गुण अभ्यासण्यास सांगतात. कारण या क्रोधाचे अनेक दु:ष्परिणाम शरीरावर, मनावर, बुद्धीवर होतात. भगवद गीतेत भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “ क्रोधामुळे भ्रम होतो, विवेक सुटतो, भ्रमामुळे तसेच अविवेकाने विस्मरण होते, विस्मरणाने निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते, आणि बुद्धिनाश झाला विवेकाचा नाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो” ( अ.२ श्लो. ६३ ) म्हणून क्रोधासारीखा अवगुण अवघाची सांडावा.....क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment