Friday, February 19, 2016

१५. नरदेह परम दुल्लभ | येणे घडे अलभ्य लाभ |

|| समर्थ वाणी ||

१५. नरदेह परम दुल्लभ | येणे घडे अलभ्य लाभ |

नरदेह परम दुल्लभ | येणे घडे अलभ्य लाभ |
दुल्लभ ते सुल्लभ | होत आहे || २०/५/२५||

            मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे. इतर देह रसहीन आहेत, नुसते कष्टकारक आहते . पण मानवी देह म्हणजे फार मोठे घबाड आहे त्याचा फायदा मोठ्या विवेकाने करून घेतला पाहिजे असे समर्थांचे सांगणे आहे. उत्तम नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्याचा योग्य उपयोग करून जर उत्तम आयुष्य जगता आले नाही तर ते जीवन व्यर्थ आहे. मानवी देह प्राप्त होऊन देखील आळसामध्ये जो आयुष्य जगतो तो सर्व बाजूनी बुडतो त्याचे केवळ नुकसानच होते.

            समाजामध्ये आपल्याला अशा काही व्यक्ती दिसतात ज्या दैवावर हवाला ठेवून निष्क्रिय जीवन जगत असतात. स्वत: काही प्रयत्न न करता आळसात दिवस काढतात. एकदा का हा आळस अंगात शिरला की हा आळस माणसाला निष्क्रिय बनवतो. देहाला जेव्हढे म्हणून सुखात ठेवता येईल या साठी सतत धडपडत राहतो. अत्यंत निरुत्साही, कमीत कमी हालचाली करणारा आळशी माणूस समर्थांना मनापासुन आवडत नाही. अशा आळशी माणसांचा समर्थ धिक्कार करतात. पण त्याचा अव्हेर करत नाहीत तर त्याला त्याने कोणते अचूक प्रयत्न करावेत याचे मार्गदर्शन करतात.

            बाराव्या दशकात समर्थ एका करंट्याचा दृष्टांत देतात. अत्यंत दुर्दैवी आणि आळशी अशा दुबळ्या माणसाच्या मागे संकटे कशी हात धुऊन मागे लागतात याविषयीचे वर्णन या दृष्टांतामध्ये आले आहे.  आळशी वृत्तीने त्याने स्वत:चे नुकसान करून घेतले आहे अशा या करंट्याला समर्थ मार्गदर्शन करतात. समर्थ अशा माणसाला कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय सहज साध्या होत नाही हा मानवी जीवनाचा नियम समजावून सांगतात. ‘केल्याने होत आहे रे’ हे सूत्र सांगून समर्थ त्याला सावधपणे आळशी पण सोडण्यास सांगतात. याठिकाणी सावधपणा यासाठी कारण जुन्या सवयी लगेचच जडू शकतात. म्हणून चिकाटीने आणि सातत्याने आळशीपणा हा दोष मुळासकट नष्ट करण्याचे मार्गदर्शन करतात. पहाटे उठावे, काही पाठांतर करावे, वायफळ बडबड सोडून द्यावी. आपल्या प्रत्येक कृतीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करावा, कोणाचे अंतकरण दुखवू नये, गोड बोलावे पण या गोड बोलण्यात ‘मुह मे राम बगल मे छुरी’ असा प्रकार नसावा. यामध्ये दुसऱ्याच्या हिताचाच असावा. उत्तम ग्रंथांचे वाचन करावे , सतत उत्तमाच्या संगतीत राहावे. या सर्वातून आपोआपच आपल्यातील दोष नाश पावतात........क्रमशः

|| जय जय रघुवीर समर्थ || 

No comments:

Post a Comment