Monday, February 15, 2016

११. मन भलतीकडे धावे | ते विवेके आवरावे ||

|| समर्थ वाणी ||

११. मन भलतीकडे धावे | ते विवेके आवरावे ||

      माणसाचे मन चंचल असते. एखाद्या फुलपाखराप्रमाणे ते वेगवेगळ्या विषयांचा विचार करीत असते. कोणत्याही एकाच विषयांवर मन चटकन स्थिर होत नाही. खरेतर मनाचे सामर्थ्य अफाट आहे. त्याची ताकद ओळखूनच समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. माणसाला विचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. कोणत्याही विषयाचे चिंतन, मनन करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त झाले आहे. मन जरी चंचल असले तरी स्वैरपणे उधळलेल्या मनावर अंकुश असणे तितकेच महत्वाचे आहे. मन मानेल तसे वागण्यापेक्षा विचारपूर्वक तसेच विवेकाने वागणे अत्यंत महत्वाचे आहे. समर्थांनी दासबोधामध्ये सत्वगुणाचे वर्णन करताना म्हटले आहे की,

मन भलतीकडे धावे | ते विवेके आवरावे |
इंद्रिय दमन करावे | तो सत्वगुण ||२|७|७०||

      मन ऐकत नाही, नको त्या गोष्टींच्या मागे धावते, ते विवेकवृत्तीने आवरावे. अचूक प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट सहज साध्य होते हा समर्थांचा विश्वास आहे.

      भगवद्गीतेत अर्जुन श्रीकृष्णाला सांगतात की, ‘ हे मन खरोखर चंचल, प्रक्षुब्ध, बलिष्ठ आणि हट्टी आहे. त्याला आवरणे मला वाऱ्याला आवण्याइतके कठीण वाटते” (६/३४) . आपला स्वत:चा अनुभव पहिला तर आपल्याला देखील अर्जुना सारखाच प्रश्न पडला आहे. चंचल आणि अस्थिर मन सतत इकडे तिकडे धाव घेते. ‘ अचपळ मन माझे नावरे आवरीता’ हा अनुभव आपण सातत्याने घेत असतो. भगवंत देखील मान्य करतात की हे मन चंचल असून आवरण्यास कठीण आहे. पण मनावर नियंत्रण ठेवणे ही गोष्ट कठीण असली तरी अशक्य नक्कीच नाही. कारण भगवंतानीच पुढे स्पष्ट केले आहे की, “हे कौंतेया अभ्यासाने आणि वैराग्याने ते नियंत्रित केले जाते”. समर्थांनी देखील अभ्यासाला, कष्टाला आणि प्रयत्नाला महत्व दिले आहे. आत्मज्ञान असो वा विज्ञान या सर्वासाठी अभ्यास आणि प्रयत्न यातील सातत्य फार आवश्यक आहे. यासाठी समर्थ साधक लक्षण समासामध्ये अभ्यासाचा संग धरण्यास सांगतात......
क्रमशः  


|| जय जय रघुवीर समर्थ ||

No comments:

Post a Comment