Wednesday, March 9, 2016

२५. हे अवघे आपणापासी | येथे बोल नाही जनासी |

|| समर्थ वाणी ||

२५. हे अवघे आपणापासी | येथे बोल नाही जनासी |
      सिकवावे आपल्या मनासी | क्षणाक्षणा || १२/२/२३||

      आपल्या जीवनात सुख भोगायचे का दु:ख हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. या बाबत कोणाला दोषी धरता येत नाही. हाच विचार आपण सतत आपल्या मनावर बिंबवत राहिले पाहिजे. भगवद्गीतेत देखील भगवंत आपल्याला सांगतात तू तुझा मित्र व्हायचे का शत्रू हे ठरवणे सर्वस्वी तुझा हातात आहे. नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा दिला तर आपणच आपले शत्रू ठरतो आणि सकारात्मक विचार मनात स्थान दिले तर आपण आपले मित्र होतो.

      समर्थ या ठिकाणी जनात वावरताना कसा व्यवहार असावा याविषयी मार्गदर्शन करतात. आपण लोकांशी चांगले वागतो तर आपल्या जीवनात सुखाची वाढ होते. पेरावे तसे उगवावे हा तर नियमच आहे. जो माणूस जसे बोलतो तसेच वागतो त्याचा मान जनामध्ये राहतो. त्याचा सर्वजण आपोआपच आदर करतात. व्यक्तीमध्ये असणारा उत्तम गुण जोपर्यंत लोकांमध्ये प्रगट होत नाही तो पर्यंत लोकाना त्याच्या योग्यतेची कल्पना येत नाही. पण त्याच्या अंगचे उत्तम गुण जेव्हा लोकांमध्ये प्रगट होतात तेव्हा तेव्हा लोकांचे मत हळूहळू बदलू लागते. आपल्या बद्दलचे लोकमत बदलत जाऊन स्वच्छ मत तयार झाले की लोकांचे प्रेम अपोआप संपादन करतात येते. 

       जेव्हा कोणी आपल्या मनातील गुपित विश्वासाने तुम्हाला सांगते तेव्हा ते रहस्य चार माणसात प्रगट करू नये. पण अनेकांना दुसऱ्याची दु:ख हा चर्चेचा विषय करायला आवडते. आपल्याच भाषेत बोलायचे झाले तर ‘गॉसिप’ हा शब्द पटकन लक्षात येईल. दुसऱ्याच्या दु:खाचे ‘गॉसिप’ करणे हे कुलक्षण आहे. अशाने त्या व्यक्तीचे अंत:करण तर दुखावतेच पण अनेकांच्या मनातील आपल्या विषयीचा विश्वास देखील आपण गमावून बसतो. परस्परांना दुखावून भांडणे वाढतच जातात त्यामुळे लोकांना व आपल्याला दुखीकष्टी व्हावे लागते. या सगळ्यामधून माझा आणि इतरांच्या जीवनात दु:ख निर्माण होते. समर्थ म्हणतात हे सगळे टाळायचे असेल तर तू विवेकाने विचार करून जनात वावर आणि आपल्या आणि इतरांच्या मनात आनंद निर्माण कर....क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||  

Tuesday, March 8, 2016

२४. वाट पुसिल्याविण जाऊ नये | फळ वोळखील्याविण खाऊ नये |

|| समर्थ वाणी ||

२४.   वाट पुसिल्याविण जाऊ नये | फळ वोळखील्याविण खाऊ नये |
         पडिली वस्तु घेऊ नये | येकायेकी || २/२/२ ||

समर्थ रामदासांच्या श्रीमद दासबोधाचा उल्लेख निघाला की आठवतात ती मूर्खलक्षण. समर्थांनी व्यक्ती विकासाच्या दृष्टीने जशी मूर्खलक्षणे सांगितली तशीच उत्तम लक्षणे देखील सांगितली. या लक्षणांमधून समर्थ आपल्याला सध्या सोप्या व्यावहारिक सूचना देतात. मूर्खलक्षणामध्ये समर्थांनी मानवी स्वार्थी वृत्तीचे दर्शन घडवले आहे. पण तुम्हाला तुमचा उत्तम विकास करून घ्यायचा असेल तर सतत सावध राहून तसेच वृत्तीत बदल करून आपल्यातील उत्तम गुणांचा विकास करून घेतला पाहिजे. यासाठी समर्थ या ओवीत व्यवहारात वागताना, या भौतिक जगात वावरताना कीती सावधगिरी बाळगा हे सांगत आहेत.
आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याठिकाणचा पत्ता नीट विचारल्याशिवाय जाऊ नका. आपण बाहेर पडताना ही काळजी घेतोच. पण आजकाल भ्रमणध्वनी ध्वनी हे माध्यम असे आहे की त्याच्या आधार आपण अत्यंत निर्धास्तपणे घर बाहेर पडतो. पण शेवटी ते एक यंत्र आहे याचा आपल्याला विसर पडतो. बरेचदा संपर्क साधण्यात आपल्याला अडचणी येतात. ज्या व्यक्तीला संपर्क साधायचा ती संपर्क क्षेत्राच्या बाहेर असते. अनेक अडचणी येऊ शकतात. पण प्रवासाला निघण्यापूर्वीच पत्ता नीट समजून घेण्याची सावधगिरी बाळगली तर आपला प्रवास ताणरहित होतो तसेच पत्ता शोधण्यात आपला वेळ देखील वाया जात नाही. आपला वेळ हा मौल्यवान आहे. त्याचा अपव्यय समर्थांना मान्य नाही यासाठी ते या बारीकसारीक गोष्टींचा विचार करतात आणि आपल्याला देखील असा विचार करावयाला प्रवृत्त करतात.
फळ ओळखील्याविण खाऊ नये: या ओंवीमधील सर्व सुचना आज देखील विचारात घेण्यासारख्या आहेत. ज्या पदार्थाचे सेवन करायचे आहे त्याची पूर्ण  माहिती असल्याशिवाय खाल्ले तर बरेचदा विषबाधा होण्याचा संभाव असतो अथवा त्याचे अन्यत्र काही त्रास होण्याची शक्यता असते. कोणतेही दुष्परिणाम होऊन शरीराला त्रास होण्यापेक्षा आधिच सावधगिरी बाळगा असे समर्थांचे सांगणे आहे. आजकाल तर ‘फळ ओळखीविण घेऊ नये’ अशी म्हणायची वेळ आली आहे. परिचय नसताना शेजारची व्यक्ती खाण्याच्या पदार्थातून गुंगीचे औषध देऊन लुबाडून नेते अशा अनेक घटना आपण रोजच वाचतो. अशा या परिस्थितीमध्ये यासर्व सूचना निश्चितच उपयोगी ठरतात.
अनोळखी वस्तूना हात लावण्याचे दुष्परिणाम अनेकांनी अनुभवले आहेत. आज अनेक ठिकाणी या सूचनांचे फलक लावलेले दिसतात की अनोळखी वस्तूना हात लावू नये, संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवण्यास सांगतात. याचा अर्थ असाच की कोणत्याही गोष्टीतील बेसावधपणा आपल्याला हानिकारक आहे. यासाठी समर्थ या सर्व सुचना देत आहेत......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||  

Monday, March 7, 2016

२३. मनी धरावे ते होते | विघ्न अवघेची नासोन जाते |

|| समर्थ वाणी ||

२३. मनी धरावे ते होते | विघ्न अवघेची नासोन जाते |
      कृपा केलिया रघुनाथे | प्रचिती येते || ७/६/३०||

            या ओवीमध्ये समर्थांनी आपल्या उपासनेविषयी विस्ताराने सांगितले आहे. त्यांनी प्रभू रामचंद्रांची जी उपासना केली, त्याचे फळ त्यांना कसे उत्तमच मिळाले त्यांना काय प्रचीती आली याचे वर्णन समर्थ करतात. त्यांनी ज्या उच्चतम ध्येयाचा ध्यास घेतला ते त्यांना साध्य झाले तो अनुभव त्यांनी याठिकाणी व्यक्त केला आहे. या ओवीतील ‘मनी धरावे ते होते | विघ्न अवघेची नासोन जाते |’ हा पूर्वार्ध चिंतन, मनन करण्यासारखा आहे. यामधून समर्थ आपल्याला सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करतात. कोणत्याही गोष्टीचा एकदा संकल्प केल्यानंतर ध्येय साध्य होई पर्यंत चिकाटीने सातत्याने कृती करत राहणे , त्याचा ध्यास घेणे हे महत्वाचे असते. पण त्यासाठी आपल्या ध्येयाचा आपण मनापासून स्वीकार करणे आवश्यक असते. कोणी म्हणाले म्हणून एखादी कृती करणे आणि मी मनापासून एखादी गोष्ट करणे यामध्ये फरक आहे.
            साध्या साध्या गोष्टीतून याचा प्रत्यय येतो. कोणत्याही गोष्टीची शिस्त ही इतर लावतात तोपर्यंत ते काम आपल्या कडून सहजपणे होत नाही, पण जेव्हा मी माझ्या मनाने ठरवते तेव्हा तीच शिस्त किंवा कृती माझाकडून सहजपणे होते. याचाच अर्थ माझा मनाचे सामर्थ्य असे आहे की मला जर काही उत्तम साध्य करावयाचे असेल तर माझे विचार, माझा आचार त्याचदृष्टीने कार्यरत राहिला तर मला माझे साध्य अचूक प्रयत्नाने साध्य होते. उदा. सकाळी लवकर उठणे, यासाठी गजर लावावा लागतो किंवा कोणाला तरी उठवायला सांगावे लागते. पण जेव्हा मी लवकर उठायचा मनाने ध्यास घेते तेव्हा गजर होण्याआधी मला जाग येते.  व्यायाम करणे, रोज चालणे याचे शरीरावर होणारे उत्तम परिणाम याविषयी आपण बरेच काही ऐकतो, वाचतो पण ते आचरणात मात्र आणत नाही याचे कारण आळस. ही झाली अगदीच सर्वसामान्य उदाहरणे. पण यामध्ये देखील अनेक जण यशस्वी होत नाही. पण जे यशस्वी होतात त्यांची जीवनशैली जाणून घेतली तर त्यांचे सातत्य,चिकाटी, उत्तमाचा घेतलेला ध्यास याचा प्रत्यय येतो. यासाठी समर्थांनी आपल्याला उत्तम सवयी लावून घेण्याचे मार्गदर्शन केले आहे. हे आपण ‘सवे लावता सवे पडे’ ( निरुपण १२ ) या निरुपणात पहिलेच आहे. समर्थांनी अचूक प्रयत्नावर भर दिला आहेच पण त्याचबरोबर सकारात्मक विंचारांचे महत्व देखील आपल्याला पटवून दिले आहे....क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ || 

Sunday, March 6, 2016

२२. लोभी धन साधू गेले | तव ते लोभी धनचि जाले |

|| समर्थ वाणी ||

२२. लोभी धन साधू गेले | तव ते लोभी धनचि जाले |
       मग ते भाग्यपुरुषी भोगिले | सावकाश ||८/१०/७९||

लोभी माणूस वस्तूंचा संग्रह करत रहातो. भरपूर धन कमावतो पण त्याचा उपभोग मात्र घेत नाही. त्याची वृत्ती केवळ धनमय होऊन जाते. तो मिळवलेले धन केवळ साठवून ठेवतो. परंतु त्याच्या मागून कोणीतरी भाग्यवान त्या धनाचा यथेच्छ उपभोग घेतो.  मनाची शांती भंग पावण्यासाठी लोभ, कामवासना याचा मोह करणीभूत ठरतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आत्यंतिक आकर्षण याला ‘काम’ म्हणतात तर एखाद्या वस्तूबद्दल आत्यंतिक आकर्षणाला ‘लोभ’ म्हणतात. या व्यक्ती वाचून अथवा वस्तू वाचून जिणे व्यर्थ वाटू लागते. हाच ‘मोह’ होय. लोभ हा गरजेपोटी नसतो तर वासनेपोटी असतो. त्यातून कधीच तृप्ती होत नाही. तृप्ती न होणे हाच तर लोभाचा स्वभाव आहे. स्त्री लोभा इतकीच तीव्र वासना धनाची असते. कितीही पैसा मिळवला तरी माणसाच्या गरजा भागात नाहीत. तो अधिकाधिक धन संचायाच्या मागे लागतो. कुटुंबाच्या सुखासाठी, सोयीसाठी न कळत कुटुंबापेक्षा धनाला अधिक प्राधान्य दिले जाते. पुरेसे अन्न, वस्त्र,निवारा या प्रमुख गरजा भागल्या तरीही भोगवादाच्या आहारी गेलेल्या माणसांचा लोभ सुटत नाही. लोभाला मर्यादा नसते. सतत अतृप्त ठेवणारा लोभ माणसाच्या दु:खालाच कारणीभूत ठरतो. हा लोभाच माणसाच्या मनात क्षोभ निर्माण करतो. समर्थ म्हणतात,
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते | म्हणोनी जनी मागुता जन्म घेते
लोभामुळे पुनरपि जननं पुनरपि मरणं मागे लागते. यासाठी या विकारापासून दूर राहण्यास समर्थ सांगतात....क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||  

Thursday, February 25, 2016

२१. काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |

|| समर्थ वाणी ||

२१. काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |

           काममगरमिठी सुटेना | तिरस्कार लागला तुटेना |
           मद मत्सर वोहटेना | भूलि पडिली || ३/१०/४||

          समर्थांनी संसाराला महापुराची उपमा दिली आहे. या महापुरात अनेक विकार भुलवत असतात. त्यात कामवासना फार वाईट म्हणून तिची मगरमिठी असा समर्थ उल्लेख करतात. कामवासनेची मगरमिठी सुटत नाही, कामवासना मनातून जात नाही. मद मत्सर हे विकार कमी होत नाही, माणूस एक प्रकारच्या मोहित अवस्थेत असतो.
          जेथे काम आहे तेथे क्रोध हा स्वाभाविक येतोच. व्यक्तीच्या मनामध्ये अनेक विषयांचा भोग घ्यावा ही लालसा नेहमीच जागरूक असते. मग ही लालसा देहभोगा विषयी असो अथवा इतर इंद्रियतृप्ती विषयीची असो. कोणत्याही विषयभोगाची लालसा माणसाचा सर्वनाशाच करते. कामवासना या विकारामध्ये शृंगाराचे पावित्र्य न येता यामध्ये स्त्री पुरुष एवढीच दृष्टी असते. यामध्ये पावित्र्य, एकात्म भाव-जीवन या व्यापक विचाराना थारा नसतो. मग या विकारातूनच लहान वयातील मुलींपासून उतार वयातील स्त्रीयांपर्यंत अनेक जाणीवर बलात्कार झाल्याचे वृत्त आपल्या कानावर येते. तरुण तरुणींवर याचा इतका प्रभाव असतो की उघड्यावर कोणतीही गोष्ट करण्यात त्यांना गैर वाटत नाही. हल्ली पशुप्रमाणे केवळ नरमाद्यांचे उघड्यावर मिलन हे मानव समाजातील प्रदूषणच म्हणावे लागेल. लोकांना न भय, न लज्जा त्यामुळे अनाथालायांची वाढ होत आहे , नको त्या रोगांना सामोरे जावे लागत आहे.
            रजोगुणापासून निर्माण होणारे हे विकार आपल्या मनावर साम्राज्य गाजवतात पण आपल्याविषयी त्यांच्या मनात दया उत्पन्न होत नाही . आपल्या आणि इतरांच्या नाशाला कारणीभूत ठरणाऱ्या या विकारापासून दूर राहण्यास समर्थ आपल्याला सांगतात.  यामध्ये यश येण्यासाठी मनावर संयम, प्रयत्नपूर्वक साधना, या माध्यमातून मन स्थिर होणे आवश्यक आहे. यासाठीच सत्पुरुषांचा सहवास, कल्याणकारी शास्त्रांचा अभ्यास आणि सद्गुरूंचा आशीर्वाद याचा लाभ व्हावा लागतो.....क्रमशः

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Wednesday, February 24, 2016

२०. कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |

|| समर्थ वाणी ||

२०. कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |

कामक्रोधे लिथाडिला | तो कैसा म्हणावा भला |
अमृत सेविताच पावला | मृत्य राहो || १/१/२५ ||

कामक्रोधाने बरबटलेला माणूस चांगला असूच शकत नाही असे समर्थांचे मत आहे. काम,क्रोध,लोभ ही नरकाची तीन द्वारे जी आत्म्याचा नाश करतात म्हणूनच त्याचा त्याग करावा याविषयीचे मार्गदर्शन भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये केले आहे. आजच्या २१ व्या शतकात माणसाने आपले जीवन सुखी होण्यासाठी अनेक क्षेत्रात प्रगती केलेली दिसते. आपल्या देहाला कमीत कमी कष्ट देऊन जास्तीत जास्त सुखी कसे राहता येईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असलेला आढळतो. ह्या बाह्यसजावटी बरोबर आपले मन देखील सुदृढ असावे याकडे मात्र त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसते. या भोगावादी जगात यांत्रिक विकासाला जेव्हढे प्राधान्य दिले जाते तेव्हढेच मानसिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. सततची जीवघेणी स्पर्धा माणसाच्या मनातील या विकारांना खतपाणी घालत असल्याने या विकारांचा विकास अधिकाधिक होताना दिसतो. या षडविकाराच्या प्रभावाने माणसातील माणूसपण हरवत चालले आहे.
            मनामध्ये निर्माण होणारी एक इच्छा कामक्रोधा बरोबर आशा, तृष्णा, दंभ, अहंकार या विकाराना घेऊन येते आणि आपला सर्वनाश करते. साधूसंत , देव ब्राम्हादिकाना देखील न सोडणारे हे विकार आहेत. यासाठीच समर्थ आपल्याला सतत सावध राहण्याची सूचना करतात. अर्जुन हा आपणा सर्वांचे प्रतिक आहे. त्याच्यासारखी संभ्रमित अवस्था आपली देखील झालेली आहे. यासाठीच या दोषांचा नाश करून आपण आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे याचे मार्गदर्शन भगवंतांनी केले आहे.......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||

Tuesday, February 23, 2016

१९. दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |

|| समर्थ वाणी ||

१९. दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |

दंभ दर्प अभिमान | क्रोध आणि कठीण वचन |
हे अज्ञानाचे लक्षण | भगवद्गीतेत बोलिले || १२/१०/२८||

            भगवदगीतेमध्ये भगवंतानी नरकाची जी तीन द्वारे सांगितली आहेत त्यापैकी क्रोध हा एक आहे. क्रोधाने स्वत:चा तसेच इतरांचा देखील नाश करणारी अनेक उदाहरणे आपण समाजात पहातो. स्वत:बरोबर इतरांचा नाश करणाऱ्या क्रोधावर विजय मिळवण्यास समर्थ सांगतात. क्रोध हा असा विकार आहे की तो येताना आपले इतर बांधव म्हणजेच मद, मत्सर, दंभ यांना देखील आपल्याबरोबर घेऊन येतो. माउलींनी या विकारांना ‘विषयदरीचे वाघ’ असे संबोधले आहे. या विकारांचे वैशिष्ट्य हे की ते येताना पाहुणे म्हणून येतात आणि नंतर मात्र आपणच त्यांच्या इतके आहारी जातो की त्यांचे गुलामच बनतो. यासाठी समर्थ आपल्याला वेळेत सावध होण्याचा इशारा देतात.

            ‘उत्तमपुरुष निरुपण’ या समासामध्ये समर्थांनी दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. तसेच अठराव्या दशकातील सहाव्या समासामध्ये तोंडाळ, कठोर वचनी, शीघ्रकोपी माणसाला समर्थांनी ‘राक्षस’ म्हणून संबोधले आहे. ‘दंभ’ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. सर्व दुर्गुणांचा हा राजा आहे. म्हणूनच भगवदगीतेत असुरी संपत्तीचे वर्णन करताना दंभ या दुर्गुणाला मानाचे स्थान दिले आहे.(१६/४)
           
            दंभ याला इंग्रजी मध्ये हायपोक्रसी हा शब्द आहे. याचा अर्थ नाटकीपण, देखावा, बाह्य डामडौल, उर्मटपणा, कठोरपणा, अज्ञान ही सर्व असुरी प्रवृत्तीत जन्मलेल्याची लक्षणे आहेत. समर्थांना सर्वात जास्त चीड या अनैतिक दुर्गुणाची आहे. यासाठीच उत्तम महंत होण्यासाठी महंत व्हा पण महंती करू नका असे समर्थ आपल्या शिष्यांना बजावतात. खोटा डामडौल आला की दंभ हा आलाच म्हणून समर्थांना महंतीचा तिटकारा आहे. हा विकार नसेल तर मनातले विचार आणि आचार याचा मेळ जमेल . विकारांवर विजय मिळवता आला तर मन:शांती लाभणे शक्य आहे.......क्रमशः


|| जय जय रघुवीर समर्थ ||